पुणे : ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदानाने तिघांचे जीव वाचतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे,’असे आवाहन झेड प्लस हॉस्पिटलचे डॉ. राहुल झांजुर्णे यांनी केले. रोटरी क्लब, हडपसर सेंट्रल आणि एस. एम. जोशी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर, तर अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य दिलीप (आबा) तुपे होते.
या वेळी बोलताना सांगोलकर म्हणाले, ‘रस्ते अपघातात हजारो लोकांचे बळी जातात, हजारो लोक अपंग होतात. त्यात बराच मोठा वाटा दुचाकी वाहनांच्या अपघातांचा आहे. त्यातही डोक्याला मार लागून अपघातग्रस्त होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. ते टाळण्यासाठी दुचाकी वाहन वापरणाऱ्यांनी हेल्मेट घालणे आणि चारचाकी वाहने वापरणाऱ्यांनी सीट बेल्ट लावणे अत्यावश्यक आहे. याबरोबरच वाहन चालवताना मोबाइलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, सिग्नल तोडू नयेत’.
‘मानवी जीवन हे अत्यंत अनमोल आहे, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनीच कृतज्ञतेची जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे,’ असे मत दिलीप तुपे यांनी व्यक्त केले.
या वेळी ५० वेळा रक्तदान करणारे प्रवीण पुजारी यांचा सत्कार करण्यात आला. पूरग्रस्तांसाठी गरजेच्या कपडे, अन्नधान्य, वस्तू यांचेही संकलन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला महेंद्र लुणीया, संपतराव खोमणे, सचिन तुपे, रंजन पराडकर, शारदा लुणीया, तरुण मित्तल, राकेश रांका, डॉ. वैशाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रंजना जाधव व प्रा. स्नेहा मुळे यांनी केले. डॉ. शरद पासले यांनी आभार मानले.